राज्य

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार – दीपक केसरकर

टीम द – लोकार्थ | मुंबई – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन हा आहार तयार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (पूर्वीचे नाव शालेय पोषण आहार योजना) सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. बुधवारी (दि.11) सायंकाळी या समितीची बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की,विद्यार्थ्यांना आहारातून पोषक तत्त्वे मिळावीत. त्याचबरोबर त्यांनी ते पदार्थ आवडीने खावीत हा विचार करून पाककृती निश्चित कराव्यात. यासाठी दररोज वैविध्यपूर्ण आहार निश्चित करून त्यात दाळ-भात आणि खिचडी बरोबरच हिरवा वाटाणा, व्हेज पुलाव, सोया चंक्स, मसाले भात, वांगी भात, नाचणी सत्व, भगर, शेवगा आदींचा समावेश करावा. जे विद्यार्थी अंडे खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडे द्यावे.

तसेच अन्य विद्यार्थ्यांना केळीचा पर्याय ठेवावा.आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश करावा. शाळांमध्ये परसबाग आवश्यक करण्यात आली आहे. यातील भाज्या आणि सलादचा देखील आहारात समावेश करावा,असे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले.यापूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेफ विष्णू मनोहर यांनी काही पाककृती तयार केल्या आहेत. त्यापैकी केंद्र शासनाच्या निकषात बसणाऱ्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

सध्या जेथे केंद्रीय स्वयंपाकगृह आणि बचत गटांमार्फत आहाराचा पुरवठा करण्यात येतो त्यातील पोषण तत्व आणि दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती सदस्यांना प्राधिकृत करण्याचे निर्देश मंत्री ,केसरकर यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर सदस्यांनी आहार तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button