मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देश का उभा आहे आणि आपल्या पाठीशी लोक का नाहीत, हे राहुल गांधींना अजूनही समजलेले नाही. ते अराजकतावादी आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कपाळाला जखम झालेली असताना राहुल गांधी गुडघ्याला पट्टी करीत आहेत. आपला पराभव नाकारण्यासाठी भारतीयांनी आपले नेतृत्व नाकारले आहे, हे ते लक्षात घेण्यास ते तयार नाहीत. लोक मोदीजींच्या पाठीशी का आहेत, हे ज्या दिवशी त्यांना समजेल त्या दिवशी कदाचित त्यांचा निवडणुका हारण्याचा हा क्रम थांबेल. त्यांची मानसिकता अराजकतावादी आहे. संविधानाने तयार केलेल्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उठला पाहिजे, अशा पद्धतीने पूर्णपणे त्यांना बदनाम करायचं, या संस्थांवरचा विश्वास उठला पाहिजे, मग लोकशाहीवरचा विश्वास उठेल आणि मग संविधानावरचा विश्वास उठेल, अशी पेरणी राहुल गांधी सातत्याने करीत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील दुषकाळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन एका पत्राद्वारे सरकारला केले. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पत्राची दखल घेतलेलीच आहे, पण राज्य सरकारने या बाबतीत जे केले पाहिजे, ते सर्व आम्ही करत आहोत, पण अजूनही त्यांना काही म्हणायचे असेल, तर त्या दृष्टीने काम करू, त्यांचे मार्गदर्शन घेत राहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
No Comment! Be the first one.