नवीन रस्ते बनवण्यापूर्वी भूसंपादनच नाही; ‘तिसरी मुंबई’ अन् महामार्गावरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या धोरणांवर आणि कामांच्या पद्धतीवर कडाडून टीका केली आहे. माणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प आणि भूमिपुत्रांचे प्रश्न यांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.
भूसंपादनाशिवाय कंत्राट अन् ‘टक्केवारी’चा खेळ
रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सध्या राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. नवीन रस्ते बनवण्यापूर्वी सरकारने आवश्यक जागेचे भूसंपादनच केलेले नाही. केवळ कंत्राटदाराला कंत्राट देऊन सरकार मोकळे झाले आहे. पैसेही गेले आणि त्यातून मिळणारे टक्केही गेले, पण रस्ता मात्र तिथेच अपूर्ण अवस्थेत आहे.”
राज्य म्हणून संपूर्ण विकासाचा विचार न करता, केवळ ‘कोणाला आणि किती टक्के मिळतील’ याचाच विचार केला जात असल्याने मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे रखडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘तिसरी मुंबई’ अन् कोकणातील भूमिपुत्रांचे प्रश्न
रायगड दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी कोकणात येऊ घातलेल्या ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पावरही भाष्य केले. या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा देत त्यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले.
विकासकामांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
माणगाव येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विकासकामांच्या दाव्यांमधील फोलपणा दाखवून दिला. कंत्राटदार-अधिकारी-राजकारणी यांच्या युतीमुळेच कोकणातील महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.