कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) गेल्या १७ वर्षांपासून रखडलेलाच आहे. या महामार्गाची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार, अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केवळ राजकीय हस्तक्षेप आणि ‘टक्केवारी’च्या संस्कृतीमुळेच या महामार्गाचे काम पूर्ण होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
माणगाव बायपासची स्वतः गाडी चालवत पाहणी
रायगड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी माणगाव बायपास आणि महामार्गाच्या दुरवस्थेची स्वतः गाडी चालवत पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांची चांगलीच कानउघाडणी करत रखडलेल्या कामाचा जाब विचारला.
कंत्राटदार नेमके कोणाला कंटाळून पळून गेले?
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला. “मी गडकरींना या रस्त्याबाबत विचारले असता कंत्राटदार काम सोडून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. पण हे कंत्राटदार नेमके कोणाला आणि कशाला कंटाळून पळून गेले? स्थानिक राजकारण्यांचा प्रचंड हस्तक्षेप आणि कामात टक्केवारी मागण्याची सवय यामुळेच कंत्राटदार काम सोडून निघून जातात,” असा आरोप त्यांनी केला.
कोकणवासीयांना कधी मिळणार दिलासा?
गेल्या १७ वर्षांत अनेक कंत्राटदार आले आणि गेले, मात्र रस्त्याची अवस्था बिकटच आहे. दरवर्षी गणेशोत्सवात लाखो चाकरमाणी खड्ड्यांतून प्रवास करतात. हा रस्ता नेमका कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी नागरिकांनाही यावर जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.